हल्ली सात्विक आहार घेताना मसालेदार पदार्थ खाऊ नका असा सल्ला दिला जातो. पण मसाल्यांचे आपले असे विशेष आहे. जेवणात मसाले घालण्यामागे काही कारणं आहेत. मसाले म्हणजे फक्त खाद्यपदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठीची सामग्री नव्हे. वैद्यकशास्त्राचे प्राचीन भारतीय ज्ञान ज्यामध्ये सामावले आहे अशा आयुर्वेदामध्ये विविध व्याधी टाळण्यासाठी व बऱ्या करण्यासाठी उपाय म्हणून मसाल्यांचे महत्त्व सांगितले गेले आहे. मसाल्यांचा योग्य तिथे, योग्य प्रमाणात वापर केल्यास जीवनशैलीमुळे उद्भवणारे आजार दूर करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे साधन म्हणून त्यांचा उपयोग होऊ शकतो अशी माहिती कविता देवगण (पोषण सल्लागार, टाटा संपन्न) यांनी दिली आहे.
मसाल्यांमुळे आपल्या आहारामध्ये अत्यावश्यक सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश होतो, ज्यामुळे आपण आजारांना दूर ठेवू शकतो. शिवाय मसाल्यांमधून अँटीऑक्सिडंट क्षमता असलेले बायोऍक्टिव कम्पाऊंड्स देखील पुरवले जातात, ज्यामुळे जीवनशैलीचे व्यवस्थापन सकारात्मक पद्धतीने करण्यात मदत मिळते. मसाल्यांमुळे पदार्थांना स्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे आपण ते मनापासून, आवडीने खातो. मसाल्यांविना हेच पदार्थ सपक व बेचव झाले असते व आपण त्यांचा नीट आस्वाद घेऊ शकलो नसतो, सहाजिकच त्यामधून मिळणारे आरोग्य लाभ आपल्याला मिळू शकले नसते.

प्रत्येक मसाल्यामध्ये आपापले पोषक गुण असतात, अर्थात प्रत्येक मसाल्याची अनोखी बायोऍक्टिव्ह कम्पाऊंड्स ज्यामुळे आपल्या शरीराला काही विशिष्ट लाभ मिळतात.
हळद : हळदीमुळे पदार्थांना आकर्षक पिवळा रंग येतो. हळदीमध्ये कर्क्यूमिनॉइड्स हे बायोऍक्टिव कम्पाऊंड्स असतात. कर्क्युमिन हे प्रमुख कर्क्युमिनॉईड आणि हळदीमधील प्रमुख सक्रिय घटक आहे, यामध्ये अँटिऑक्सिडंट, अँटी-इन्फ्लेमेटरी (दाह, जळजळ रोखणाऱ्या) व अँटी-मायक्रोबायल (सूक्ष्मजीवविरोधी) क्षमता असतात.
जिरे: जिऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात लोह असते, जे लाल रक्त पेशी व शरीराच्या विविध भागांना प्राणवायू पोहोचवणारे हिमोग्लोबिन निर्माण करण्यासाठी आवश्यक असते. शिवाय जिरे पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. भारतीय स्वयंपाकघरांमध्ये जिऱ्याची फोडणी अतिशय प्रसिद्ध आहे. चमचाभर जिरे एक ग्लासभर पाण्यात टाकून रात्रभर ठेवून ते पाणी पिणे हा पचनाच्या समस्या दूर करण्याचा पारंपरिक उपाय सर्रास केला जातो.
काळी मिरी : काळ्या मिरीमध्ये पिपरीन आणि लिमोनेन व बीटा-कॅरियोफिलेन ही इसेन्शियल ऑईल्स असतात. या बायोऍक्टिव कम्पाऊंड्समध्ये अँटीऑक्सिडंट व अँटी-इन्फ्लेमेटरी क्षमता असतात, ज्या गुणकारी आहेत.
लवंग : लवंगीमध्ये कफ दूर करण्याची सेंद्रिय क्षमता असते. लवंग घशातील कफ व अन्ननलिका साफ करण्यात मदत करते. श्वसनमार्गाला होणाऱ्या संसर्गांना आळा घालण्याचे काम लवंग करते.
ओवा: सर्दीवर उपचार म्हणून तसेच नाकातील अवरोध दूर करण्यात ओवा गुणकारी आहे. फ्ल्यूचे विविध प्रकार, श्वसनाचे आजार यावर हे एक प्रभावी औषध आहे. ओव्याच्या तेलातील प्रमुख घटक थायमॉल पचन प्रक्रियेला उत्तेजित करतो व अन्न चांगले शोषले जाण्यात मदत करतो.
कसुरी मेथी: फारशी प्रसिद्ध नसली तरी कसुरी मेथी पदार्थांना उत्तम स्वाद मिळवून देण्यात अव्वल आहे, इतकेच नव्हे तर यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. शरीरातून कोलेस्टेरॉल व दाह दूर करण्यामध्ये प्रभावी ठरणारी कसुरी मेथी पचनक्रियेत मदत करते, शरीराची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत राखते, रक्तातील शर्करा नियंत्रणात ठेवते.
धणे पूड: पोटफुगी दूर करण्यात व पचन प्रक्रियेत मदत करण्यात हा उत्कृष्ट गुणकारी मसाला आहे. आतड्याचे आरोग्य चांगले राहावे, सर्दीच्या विषाणूंपासून रक्षण व्हावे व संसर्ग झाल्यास लवकर बरे वाटावे यासाठी भारतीय स्वयंपाकामध्ये हा धणे पूड रोजच्या रोज वापरली जाते.
गरम मसाला: सर्व अख्खे मसाले एकत्र करून त्यांची पूड करून गरम मसाला तयार केला जातो. यामध्ये बायोऍक्टिव कम्पाऊंड्स भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे त्यापासून शरीराला अनेक वेगवेगळे लाभ मिळू शकतात. पचनास मदत करण्यापासून ते दाह दूर करण्यापर्यंत अनेक बाबतीत गरम मसाला गुणकारी असतो. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत राखतो. पोटफुगी होण्यापासून रक्षण करतो.
मसाल्यांमध्ये इतके मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि बायोऍक्टिव्ह कम्पाऊंड्स असल्यामुळे आरोग्यदायी खाण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी रोजच्या आहारात मसाल्यांचा समावेश फायद्याचे आहे यात काही शंका नाही.