उत्तर भारतीयांनाही मिळावा ओबीसीचा दर्जा

मुंबईत राहणारे उत्तर भारतीय समाजाचे लोक मग ते उत्तर प्रदेशचे असोत किंवा बिहारचे असोत किंवा उत्तर भारतातील अजून कोणत्या भागातील असोत, हे लोक काबाडकष्ट करून आपल्या परिवाराचे पोट भरणारे लोक आहेत. कितीही बिकट परिस्थिती आली तरीही त्या परिस्थितीशी लढून त्या परिस्थितीवर मात करणारे लोक आहेत. मुंबईच्या विकासामध्ये उत्तर भारतीय समाजाचे मोठे योगदान आहे. हा समाज आता मुंबईचा अविभाज्य भाग बनला आहे. या समाजाचे काँग्रेस पक्षाशी जुने नाते आहे. उत्तर भारतीय समाज हा लढणारा समाज आहे तसेच काँग्रेस पक्ष सुद्धा लढणारा पक्ष आहे. हा समाज मोठ्या संख्येने काँग्रेसशी जोडला जात आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा सुपडा साफ होणार हे निश्चित आहे. केंद्रातील मोदी सरकार पैशाच्या बळावर निवडून आलेले सरकार पाडते आणि लोकांना ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून आपल्या बाजूला आणते. आज देशातील सर्वसामान्य जनता महागाईने हैराण झाली आहे. उपजीविकेची सर्व साधने बंद होत आहेत. मात्र मोदी सरकार देशात धर्माच्या नावावर राजकारण करण्यात व्यस्त आहे. भाजपने जनतेचा विश्वास पूर्णपणे गमावला आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप पूर्णपणे धराशायी होणार आहे, असे विधान उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी मुंबईत केले. काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेस आणि उत्तर भारतीय सभातर्फे मुंबईमध्ये “उत्तर भारतीय सामाजिक सांस्कृतिक संमेलनाचे” आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

या उत्तर भारतीय सामजिक सांस्कृतिक संमेलनामध्ये अजय राय यांच्यासोबत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, संमेलनाचे आयोजक माजी खासदार संजय निरुपम, आमदार कपिल पाटील, संत ओमदास महाराज, उत्तर पश्चिम मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि उत्तर भारतीय समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संमेलनामध्ये उत्तर भारतीय समाजाच्या ज्वलंत मुद्द्यांवर चार प्रस्ताव ठेवण्यात आले आणि सर्वानुमते पारित करण्यात आले.

यावेळेस बोलताना काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम म्हणाले की, मुंबईमध्ये ५० लाखांपेक्षा अधिक उत्तर भारतातील विविध भागातील लोक वर्षानुवर्षे राहत आहेत. आपला उदरनिर्वाह करत आहेत. हे उत्तर भारतीय समाजाचे लोक मुंबईचा एक अविभाज्य भाग बनलेले आहेत. पण या लोकांचे बरेच असे मुद्दे आहेत, अशा समस्या आहेत. ज्यांची वारंवार उपेक्षा होत आलेली आहे. अशाच काही मुद्द्यांबद्दल आपण उत्तर भारतीय समाजाच्या हितासाठी काही प्रस्ताव आज पारित करणार आहोत. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे मुंबईत उत्तर प्रदेश, बिहार व झारखंडमधून आलेले बरेच लोक हे ओबीसी समाजाचे आहेत. परंतु महाराष्ट्रातील कायद्यांमधील काही दोषपूर्ण त्रुटींमुळे आणि वेगळी आडनावे असल्याने या उत्तर भारतीय ओबीसी समाजाच्या लोकांना आजपर्यंत ओबीसींचा दर्जा दिला गेला नाही. एक देश एक कायदा असून देखील फक्त आडनाव वेगळे असल्याने त्यांना ओबीसीचा दर्जा दिला गेला नाही. आमची सरकारकडे अशी मागणी आहे की महाराष्ट्र सरकारने उत्तर भारतीय समाजाची जातीनिहाय जनगणना करावी आणि त्यातील प्रत्येकाला त्याच्या व्यवसाय व जातीनुसार ओबीसींचा दर्जा द्यावा, जेणेकरून त्यांना त्याचा लाभ घेता येईल. या मागणीचा प्रस्ताव आम्ही पारित करत आहोत. दुसरे म्हणजे. मुंबईमध्ये झोपडपट्टीतील घरांपैकी दुमजली घर असल्यास फक्त तळमजल्याला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये (एसआरए) पात्र ठरवले जाते. वरच्या मजल्याला अपात्र ठरवले जाते. त्यामुळे मोठे कुटुंब असल्यास त्यांची यामध्ये कुचंबणा होते. आमची अशी मागणी आहे कि, झोपडपट्ट्यांमधील तळमजल्यासोबत पहिला माळ्याला देखील एसआरए योजनेसाठी पात्र ठरवले जावे. जेणेकरून गरीब मुंबईकरांना त्यांच्या हक्काची दोन घरे मिळतील, यावर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. असा आमचा प्रस्ताव आहे.

तिसरे म्हणजे भारतामध्ये २०१३ मध्ये काँग्रेसचे सरकार असताना फेरीवाला कायदा संसदेमध्ये पारित करण्यात आला होता. पण आज कायदा पारित होऊन १० वर्षे झाली, तरी सुद्धा मुंबई महानगरपालिकेने तो आजतागायत लागू केलेला नाही. आमची महाराष्ट्र सरकारजवळ मागणी आहे की, त्यांनी तात्काळ फेरीवाला कायदा लागू करावा आणि मुंबईतील चार ते पाच लाख फेरीवाल्यांना सन्मानजनक जीवन जगण्याची संधी द्यावी, असा आमचा प्रस्ताव आहे. चौथी गोष्ट म्हणजे मुंबईत टॅक्सी-रिक्षाचालक यांच्या समस्या, मुंबईतील गरीब टॅक्सी रिक्षा चालकांना नवीन ट्राफिक नियमांच्या नावाखाली आणि नवीन तंत्रज्ञानाच्या व ई चलन च्या नावाखाली नेहमी त्रास दिला जातो. शुल्लक कारणावरून त्यांच्याकडून १००० ते १२०० रुपये फाईन घेऊन त्यांची लूट केली जाते. हे लवकरात लवकर थांबायला हवे. जर कुणी खरंच ट्राफिक नियमांचे उल्लंघन केले तर त्यावर कारवाई जरूर केली जावी पण विनाकारण त्यांना त्रास देणे, त्यांच्या गाडीचा फोटो काढून त्यांना फाईन मारणे हे प्रकार त्वरित बंद झाले पाहिजेत. असा आमचा प्रस्ताव आहे. हे प्रस्ताव आम्ही आज सर्व उत्तर भारतीय समाजाच्या वतीने पारित करत आहोत.

उत्तर भारतीय समाजाचे हे सर्व चारही प्रस्ताव घेऊन काँग्रेसचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत आणि तशीच वेळ पडल्यास आम्ही या मागण्यांसाठी भविष्यात रस्त्यावर उतरू आणि तीव्र आंदोलन करू, असा गर्भित इशारा संजय निरुपम यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *