महाराष्ट्र राज्य शासनाचे 19 अधिकारी सध्या ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंडच्या अभ्यास दौऱ्यावर आहेत. हे सगळे अधिकारी ग्रामीण विकास खात्यातील असून त्यांना खास कारणासाठी या दौऱ्यावर पाठवण्यात आले आहे. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान हा दौरा असून आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या सुधारणा, कामाचे स्वरुप, कामतील कौशल्य तसेच येथील रस्त्यांचे बांधकाम पाहण्यासाठी या अधिकाऱ्यांना खास ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंडमध्ये अभ्यास दौऱ्यासाठी पाठवण्यात आले आहे. (Government Officers On Study Tour)
पावसाळ्यात रस्त्यांची होणारी दूरवस्था आणि त्यामुळे होणारे अपघात हा कायमच चर्चेचा विषय असतो. रस्त्यांच्या दूरवस्थेमुळे अनेकदा मुंबईकरांना ट्राफिकचा मन:स्ताप सहन करावा लागतो.इतकेच नाही तर यामुळे अनेक अपघात झाले असून अनेकांचा मृत्यूही रस्ते अपघातात झाला आहे. चांगले आणि खड्डेमुक्त रस्ते हा सर्वसामान्य नागरिकांचा अधिकार आहे असे मुंबई उच्च न्यायालयाने 5 वर्षांपूर्वी सांगितले होते. त्यानंतरही रस्त्यांची खास अशी सुधारणा करण्यात आलेली नाही. म्हणूनच मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे आणि मुंबई येथील 6 महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई देखील केली होती. पण अद्याप कोठेही सुधारणा झालेली दिसत नाही. परदेशातील रस्त्यांबद्दल कायमच बोलले जाते. पण त्यांचे रस्ते हे अधिक टिकाऊ का असतात? कशापद्धतीने ते बनवले जातात. कोणत्याही हवामानाचा त्यावर परिणाम का होत नाही या सगळयाचा अभ्यास या अधिकाऱ्यांना या दौऱ्यात करायचा आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत आणि आशिया विकास बँक यांच्या मदतीने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या दौऱ्याचा खर्च हा कोणत्याही राज्य शासन किंवा क्रेंद्रातून होणार नाही. जे 19 अधिकारी या दौऱ्यावर गेले आहेत त्यांना सगळ्या गोष्टीचा अभ्यास करुन देशात आल्यानंतर त्यांना मिळवलेली माहिती आणि कौशल्याचा उपयोग हा अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी करायचा आहे.