महाराष्ट्रात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. या प्राचीन मंदिराचा आपला असा एक वारसा आहे. मंदिरांचा इतिहास आणि महत्व टिकून राहणे हे फार गरजेचे आहे. त्यासाठीच मंदिर ही सुरक्षित राहायला हवीत. महाराष्ट्रात अशी अनेक प्राचीन मंदिरे आहेत त्यांना जिर्णोद्धाराची गरज आहे. महाराष्ट्र शासनाने याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. यासाठीच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर जिर्णोद्धार समितीची स्थापना करण्याची मागणी विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हे मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कार्यात वाहिले आहे. त्यामुळे राज्यातील प्राचीन मंदिरांचा वसा टिकवून ठेवण्यासाठी जी समिती स्थापन करणार त्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
ही केली मागणी
हिंदुस्थानचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील दीपस्तंभ म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. आधुनिकतेची शिखरं महाराष्ट्र मोठ्या दिमाखाने मिरवतोय. हा सर्व डोलारा उभा आहे तो महाराष्ट्राच्या प्राचीन संपन्नतेवर. या इतिहासाची साक्षं देणारी हजारो वर्षांपूर्वीची मंदिरं आजही उभी आहेत. आपल्या भव्य दिव्य संस्कृती परंपरेची साक्ष देत आहेत. या मंदिरांकडे पाहिलं तरी नव्या काळात उर्जा मिळते.
सध्या पवित्र श्रावण महिना सुरु आहे. त्या निमित्तानं राज्यभरातील शिव मंदिरांना भेटी देण्यासाठी भाविक लाखोंची गर्दी करतायत. शिव मंदिरांसह हेमाडपंथी वास्तुरचना असलेल्या अनेक प्राचीन मंदिरांचा जिर्णोद्धार करण्याची गरज समोर येते आहे. यासाठी डेक्कन महाविद्यालय, तसेच पुरातत्त्व विभागाची मदत घेता येईल. मंदिर जिर्णोद्धारासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर जिर्णोद्धार सर्वेक्षण समिती’ गठीत करावी. या समितीच्या माध्यमातून राज्यभरातील सर्व प्राचीन मंदिराचे सर्वेक्षण करता येईल. राज्य शासनापुढे समितीने अहवाल सादर केल्यानंतर जिर्णोद्धाराच्या दिशेने योग्य पावलं टाकता येतील.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मॉंसाहेबांनी संपूर्ण आयुष्य मंदिर जिर्णोद्धार कार्यात वाहिलं. मंदिरांसोबत त्या नवभारताची निर्मितीही करत होत्या. देशाच्या सीमानिश्चिती करत होत्या. जिर्णोद्धार कार्यातून स्थानिक स्तरावर मोठे उद्योग निर्माण झाले. बाजारपेठा तयार झाल्या. त्यातून तत्कालीन अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. अहिल्यादेवींची दूरदृष्टी आम्हाला आपणात दिसते. त्यामुळे आपल्या हातून हे जिर्णोद्धार कार्य नक्की पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे.
असे निवेदनाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. येत्या काळात महाराष्ट्रातील मंदिरांना चांगले दिवस येतील अशी अपेक्षा आहे.