नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

राजकारणात औरंगजेबाचा मुद्दा सध्या चांगलाच गाजताना दिसत आहे. नुकतीच उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांच्या राजकारणाची तुलना ही औरंगजेबाशी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप नेत्यांनीही उद्धव ठाकरे यांना काही सवाल केले आहेत. सध्या ठाकरेंचे कट्टर विरोधक असलेले नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला असून बाळासाहेबांच्या बाकी वंशंजांना उद्धवस्त करणारा औरंग्या कोण? असा तिखट सवाल नितेश राणे यांनी केला आहे. आता औरंगजेबाच्या या मुद्द्यावरुन उद्धव- नितेश आमने सामने आलेले दिसत आहे.

यासंदर्भात नितेश राणे यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, मनसेचे सहा नगरसेवक पळवणारा औरंग्या कोण होता? राजसाहेबांना बाळासाहेंबापासून तोडणारा औरंग्या कोण होता? बाळासाहेबांच्या बाकीच्या वंशजांना उद्धवस्त करणारा औरंग्या कोण होता? आता कोठडी दिसायला लागल्यावर नाती आठवली! अशा कपटी वृत्तीचा औरंग्या कोण?

कोव्हिड काळात भष्ट्राचार करायला आम्ही सांगितेल होते का?- नितेश राणे

हा वाद इथेच थांबलेला नाही. आजही नितेश ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, मुलाची दिवाळी आर्थर रोड जेलमध्ये जाईल या भितीने उद्धव ठाकरे चांगलेच संतापले आहेत. त्यामुळेच ते त्यांचा सगळा राग भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर काढत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना सत्ता काळात त्यांच्या भावाप्रमाणे त्यांना वागवलं. त्यांना राग मुळात भाजपा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाही तर त्यांना सध्या होणाऱ्या कारवाया यामुळे होत आहे. या कारवाया रवींद्र वायकर, किशोरी पेडणेकर यांच्यावर जरी होत असल्या तरी उद्धव यांना कल्पना आहे की, आपला मुलगा ही या कारणामुळे जेलमध्ये जाणार आहे. कोव्हिड काळात भष्ट्राचार करायला आम्ही सांगितेल होते का? याचा राग कुणावर काढायचा हे कळत नसल्यामुळे उद्धव ठाकरे हे फडणवीस यांच्यावर राग काढत आहेत. असा टोला लावायला ते अजिबात विसरले नाही.

नितेश राणेंनी लगावलेल्या या टोल्यानंतर उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *