पावसाळ्याच्या या काळात अनेक साथीचे आजार डोकं वर काढू लागतात. सर्दी, ताप, जुलाब या सोबतच सध्या प्रामुख्याने ‘डोळे येणे’ (Eye Irritation) या आजाराचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. डोळे येणे हा जरी सौम्य प्रकारातील आजार असला तरी संसर्गजन्य असा हा आजार असल्यामुळे हा एकाकडून दुसऱ्याकडे अधिक गतीने पसरताना दिसत आहे. हा आजार होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने खबरदारी घेतली आहे. या आजाराशी दोन हात करण्यासाठी आणि संसर्ग थांबवण्यासाठी हात धुण्यासारख्या चांगल्या सवयींची नियमावली दिली आहे. त्यामुळे हा आजार आटोक्यत आणणे सहज शक्य होणार आहे.
‘डोळे येणे'(Eye Irritation) याचे पहिले लक्षण आहे ते म्हणजे कोणतेही कारण नसताना डोळा लाल होणे, डोळ्याला सूज येणे, डोळ्यातून पाणी गळणे, डोळा लहान दिसू लागणे ही त्याची काही अन्य लक्षणे आहेत. डोळे आल्यानंतर आणि येऊ नये या दोन्हीसाठी खबरदारी बाळगताना स्वच्छता पाळणे फारच जास्त गरजेचे आहे. डोळ्यांना थेट हात न लावता हात धुवून मगच चेहऱ्याला आणि डोळ्याला हात लावावा. इतकेच नाही तर डोळ्यांना अधिक त्रास होत असेल तर तातडीने डॉक्टरांना दाखवून त्यावर रितसर उपचार करुन घेणेही गरजेचे आहे. डोळे हा अत्यंत नाजूक अवयव आहे त्याची काळजी घेताना कोणतीही हयगय करु नये असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
राज्यात आतापर्यंत 3 लाख 57 हजार 265 हून अधिक रुग्ण सापडले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्याप्रमाणात रुग्ण आढळले आहे. त्या ठिकाणी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. शाळेतील मुलांची तपासणी केली जात आहे. त्यांना आवश्यक ती औषधे देखील पुरवण्यात येत आहे.
जर तुम्हालाही डोळ्यासंदर्भात असे काही त्रास जाणवत असतील तर स्वच्छता आणि योग्य उपचार पद्धत घेणे गरजेचे आहे.