मुंबई भाजपातर्फे गणेशोत्सवाचे जोरदार स्वागत करण्यासाठी मुंबई भाजपाची टिम तयार झाली असून याही वर्षी ‘मुंबईचा मोरया’ ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 6 ट्रेन आणि 338 एसटी आणि खाजगी बस मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली.गणेश भक्तांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीने गतवर्षी पासून ‘मुंबईचा मोरया’ या भव्य गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून याहीवर्षी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

गेल्यावर्षी 1200 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सहभाग घेतला होता. यंदा तर 2500 हून अधिक गणेश मंडळे सहभागी होतील अशी अपेक्षा आहे, असा विश्वास ही आमदार अँड आशिष शेलार यांनी व्यक्त करताना मुंबईतील अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहनही आ. ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.
तसेच दरवर्षी प्रमाणे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना यावेळी मुंबई भाजपा तर्फे 1 तर मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यातर्फे 1 आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितशे राणे यांच्यातर्फे 2 ( मोदी एक्सप्रेस) अशा 4 रेल्वे गाड्यांचे पूर्ण नियोजन झाले असून अजून 2 गाड्या प्रस्तावीत असून एकूण 6 रेल्वे गाड्यांची सुविधा कोकणवासीयांना करण्यात आली आहे. 15 तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
तर मुंबई भाजपातर्फे कोकणातील चाकरमान्यांसाठी 256 एसटी बसची मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून काही नगरसेवकांनी आपापल्या विभागात खाजगी बसच्या सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अंधेरी येथून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्यातर्फे 51 बस सोडण्यात येत असून वांद्रे पश्चिम येथून ही 31 एसटी बस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाजपाकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, अलिबाग अशा कोकणातील सर्व गावा पर्यंत 338 हून अधिक बसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
आरेमध्ये कृत्रिम तलाव करणार
आरे मधल्या तलावात गणेशमूर्ती विसर्जनाला काही जणांनी बंदी असावी, असे आदेश आणले आहेत. काही लोक गणेशोत्सवात सतत विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र आज मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि उपनगर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपण विनंती केली असून आरे मध्ये कृत्रिम तलाव तयार करुन विसर्जन व्यवस्था करण्यात येईल आवश्यकता भासल्यास डिपीडीसी मधून फंड खर्च करु अशी भूमिका पालकमंत्र्यांनी घेतल्याची, माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.