महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पीएम किसानचा पुढील हप्ता त्याचबरोबर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे तसेच अन्य अटींची पूर्तता करण्याबाबत ऑगस्ट महिन्यापासून विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेद्वारे राज्यातील १३ लाख ४५ हजार शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी कायमस्वरूपी पात्र ठरले आहेत.
कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः पुढाकार घेऊन कृषी, महसूल, भूमी अभिलेख आदी विभागांचा समन्वय साधून ई-केवायसी पूर्ण करणे, भूमी अभिलेखाच्या नोंदी अद्ययावत करणे, आधार बँक खात्याशी संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता करून घेत राज्यातील १३ लाख ४५ हजार शेतकरी या दोन्हीही योजनांच्या लाभास पात्र करवून घेतले आहेत.
पीएम किसान योजना जेव्हा नव्याने सुरू करण्यात आली त्यावेळी राज्यातील सुमारे १ कोटी १९ लाख शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली होती. त्यांपैकी सुमारे ९५ लाख शेतकरी पात्र ठरले. मात्र वरील अटींची पूर्तता न केल्याने १३ व्या आणि १४ व्या हप्त्यात त्यापैकी ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना पीएम किसानचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. १५ व्या हप्त्यासाठी ई-केवायसीची अट आता अनिवार्य करण्यात आली आहे.
मुळात ९५ लाखापैकी मयत, कर भरणारे व इतर कारणांनी रद्द करून ९२.८७ लाख शेतकरी पात्र ठरत आहेत. पण त्यांपैकी ८२.५९ लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झालेले होते. धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून कृषीविभागाने विशेष मोहीम हाती घेतल्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी, कृषीमित्र, यांच्यासह कर्मचाऱ्यांनी कॅम्प घेऊन, बांधावर जाऊन १३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण, बँक खाते संलग्न करणे, भूमिअभिलेख नोंदी पूर्ण करून अद्ययावत करून घेणे या अटींची पूर्तता करून घेतली. यामध्ये ९.५८ लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे, २.५८ लाख शेतकऱ्यांचे खाते आधार संलग्न करणे, १.२९ लाख शेतकऱ्यांचे भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत करणे बाबत कामकाज पूर्ण झाले आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनी सातत्याने विभागाच्या बैठका घेऊन वारंवार आढावा घेतल्याने या कामाला आणखीनच गती प्राप्त झाली.