राज्यातील अंगणवाडी सेविकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. अपुरा पगार आणि कमी सोयीसुविधा या सगळ्यांमुळे अंगणवाडीत काम करणाऱ्यांना अत्यंत हालाखीच्या स्थितीत काम करावे लागत होते. पण आता तब्बल 14 वर्षांनी महायुतीकडून एक चांगला असा निर्णय घेण्यात आला आहे. आता अंगणवाड्यांना त्यांचा दर्जा मिळणार आहे. त्यामुळे अनेक गोष्टी सुधारण्यात येणार आहे. ही माहिती राज्य महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. यामुळे होणारे फायदे देखील त्यांनी सांगितले आहे.
शिक्षण हा सगळ्यांचा हक्क आहे. या शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शासनाचे अनेक प्रयत्न सुरु असतात. अंगणवाडी हा त्यापैकीच एक प्रकल्प आहे. या अंगणवाडीच्या माध्यमातून बालविकास चालतो. अनेक गावांमध्ये अंगणवाडी असतात या अंगणवाडीच्या माध्यमातून मुलांचा आहार आणि त्यांचे पोषण सुधारण्यासाठी, बालमृत्यूचे प्रमाण टाळण्यासाठी अंगणवाडी सुरु करण्यात आल्या. पण सध्यस्थितीत या अंगणवाड्यांना अत्यंत हालाखीचे असे दिवस आलेले आहेत. अंगणवाडीत काम करणाऱ्या सेविकांना अपुरा पगार आणि अपुऱ्या सोयीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण आता मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन होऊन त्यांना अंगणवाड्यांचा दर्जा मिळणार आहे. त्यामुळे या अंगणवाडीत काम करणाऱ्या मिनी अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी सेविकांचा दर्जा मिळणार आहे. इतकेच नाही. तर यामुळे काही नवी पदभरती देखील होणार आहे. यामध्ये मदतनीस,मुख्यसेविका / पर्यवेक्षिका अशा पदांचा समावेश असणार आहे. त्यामुळे या माध्यमातून अनेकांना लाभ घेता येणार आहे. असे ट्विट आदिती तटकरे यांनी केले आहे.
या नव्या निर्णयामुळे अंगणवाडीत काम करणाऱ्यांना आणि करु इच्छणाऱ्यांना फायदा होईल यात शंका नाही.