Kokan Railwaysकोकणवासियांसाठी शिमगा हा अत्यंत महत्वाचा असा सण. होळीच्या दरम्यान येणाऱ्या या शिमग्यासाठी अनेक चाकरमानी कोकणाची वाट धरतात. परंतु यंदा जर तुम्ही जाण्याचा विचार करत असाल आणि रेल्वे हा पर्याय निवडला असेल तर तुमच्यासाठी ही बातमी फारच महत्वाची आहे. कारण मध्य आणि कोकण रेल्वेने कोकणात जाणाऱ्या तब्बल 18 गाड्या या रद्द केलेल्या आहेत. त्यामुळे कोकणवासियांचे चांगलेच नुकसान होणार आहे यात कोणतीही शंका नाही.
होळीला आता अवघे काहीच दिवस उरले आहेत. होळीच्या दरम्यान चिपळूण, खेड, रत्नागिरीच्या पट्ट्यात शिमगोत्सव साजरा केला जातो. हा अत्यंत मानाचा असा सण असून यात अनेक जण आपल्या गावात खास पालखी नाचवण्यासाठी जातात. यावेळी एक वेगळीच मजा इथे पाहायला मिळते. परंतु आता या गाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांना चांगलीच समस्या होणार आहे.
कोकणात शिमग्यासाठी जाणाऱ्या प्रवासांचे नियोजन करण्यासाठी रेल्वेकडून काही खास गाड्यांची घोषणा करण्यात आली होती. दिवा-रोहा गाडीचा चिपळूणपर्यंत विस्तार करण्यात आला होता. असे केल्यामुळे ही गाडी दिव्यातच भरेल त्यामुळे पुढील प्रवाशांना त्यात अजिबात जागा मिळणार नाही. त्यामुळे स्वतंत्र गाडी काढण्याचा प्रस्ताव प्रवाशांनी केला होता. ती मागणी मान्य करुन रेल्वेने रोहा-चिपळूण अशा गाड्या सोडण्याचे ठरवले होते. परंतु आता 15 ते 30 मार्च दरम्यान घोषित गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल होणार आहे.